Skip to main content

You cant Kill Thoughts..!

ठो ठो वाल्यांचा पराभव

दाभोलकर- पानसरेंच्या हत्येनंतरही हिंदुत्ववाद्यांसमोरील आव्हानं संपलेली नाहीत. या दोघांच्या खुन्यांपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत, नजीकच्या काळात पोहोचू शकतील अशी शक्यताही कमीच आहे. मधल्या काळातल्या सत्तांतराबरोबरच अच्छे दिन येतील असं वाटणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना दररोज कुणी ना कुणी टक्कर द्यायला उभा ठाकतोय. कालपरवा विचारवंत डॉक्टर एम एम कलबुर्गीना पण गोळ्या घातल्या. त्यांचा ही विचार समाजाला घातक होता म्हणे. गोळ्या खूप आहेत आणि टार्गेट ही... त्यामुळे हे कधी थांबणार, मारेकरी कधी पकडले जाणार वगैरे प्रश्न आता मला पडत नाहीत. बाकीच्यांची का पडतायत हे ही एक कोडंच आहे. खरं तर टार्गेट न संपणे हा एक प्रकारे दाभोलकर- पानसरे- कलबुर्गींच्या विचारांचा विजयच आहे. गांधी मारल्यानंतर पण टार्गेट संपले नाहीत हा पण गांधीचा विजयच आहे... तसं अगदी.
विवेकवादी नेत्यांना अशा पद्धतीने मृत्यू येणं हे सभ्य समाजाला साजेसं नाही. सत्ता कुणाचीही असो. असे प्रकार घडत असतात. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकालात दाभोलकरांचा खून होतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात पानसरेंना संपवलं जातं. समाजातील अतिरेकी संघटनांना त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी तशी सर्वच परिस्थिती सारखीच. उलट यापुढे ही जाऊन म्हणावं लागेल की सत्ता, प्रशासन, समाजकारणातील अनेक लोकांचा अशा शक्तींना छुपा पाठिंबा ही असतो. दाभोलकर-पानसरे ज्या मुल्यांसाठी, विषयांवर लढले त्यातील बराच कालखंड हा काँग्रेस राजवटीचा आहे. त्यामुळे या लोकांची लढाई ही सत्ते सोबत किंवा एका पक्षा सोबत नसून समाजातील अपप्रवृत्तींच्या विरोधात होती हे आधी मान्य करावं लागेल. कॉ. पानसरें हे जरी एका पक्षाचं काम करत होते तरी त्यांच्या कामाची मान्यता सर्वच घटकांमध्ये होती. कलबुर्गी यांनी जे विचार मांडले ते काही कुठल्या सत्तेच्या विरोधातले नव्हते. अंधश्रद्धा, शोषण, समानता, धर्माच्या नावाखाली होत असलेली लूटमार यावर यांची साधी मांडणी होती. हे लोक काही कधी मारामारी करायला रस्त्यावर उतरले नाहीत की दगडं मारून यांनी कुणाच्या काचा फोडल्या नाहीत. यांना धर्मसत्ताही ताब्यात घ्यायची नव्हती. फक्त काही प्रश्न विचारायचे होते.
दाभोलकर - पानसरे- कलबुर्गींनी नेमके काय केलं म्हणून त्यांना मारले गेलं असावं, असा प्रश्न मला पडतो अधून- मधून. आपापल्या विचारधारेशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. तसं अनेक लोक करतात.
त्यांनी प्रश्न विचारले.. असे प्रश्न ही अनेक लोक विचारतात..
त्यांनी प्रश्न विचारायचा शिकवलं ... हे ही अनेक जण करतात.. त्यांनी सांगितलं माझ्या बुद्धीला ज्या गोष्टी पटतात त्या मी स्वीकारतो.. असं पण अनेकजण सांगतात.
ते म्हणाले माझी विज्ञानाने श्रद्धा आहे.... हे म्हणाले हा धर्मावर घाला आहे.
ते म्हणाले माणूस ही माझा धर्म आहे. हे म्हणाले आम्ही सांगू तोच धर्म आहे. ते म्हणाले माझ्या धर्माची चिकित्सा करण्याचा मला अधिकार आहे.... ठो..ठो..ठो....!
धर्माने सांगितलाय अधर्म करणाऱ्यांना संपवा... पण लोच्या झाला. हा अधर्म वाढायलाच लागलाय. आता तर कोण पण उठतोय आणि प्रश्न विचारतोय.... किती लोकांना ठोकायचं....? प्रश्न तिथेही संपलेली नाहीत. साले, असेच मेले असते तर गाजावाजा झाला नसता. कदाचित फ्युनरल ला पण कोणी गेलं नसते.बंदुकीच्या गोळीत घाबरवायची ताकतच नाही. हजारांच्या संख्येने हे प्रश्नवाले लोक बाहेर पडलेयत. यांनी काय काम धंदे नाहीत क? प्रश्न विचारण्यांची घरं कशी चालतात? फाॅरेन फंडींग येत असणार?? ठो..ठो...ठो....
फंड पण थांबवला, पण परत आहेतच रस्तावर हे... यांच्या डोक्यातच किडा आहे. हा किडा फक्त भगवद्गीता खातो... ठो.. ठो..ठो....
ही किडा काय मरत नाही. यांने कुराण आणि बायबल ल पण खायला सुरूवात केलीय... हुश्श......! गोळीचा असर होतोय बहुतेक. पण मधून मधून हा किडा परत येतो.... ठो..ठो...ठो..
सनातन्यांचे सध्या हाल सुरू आहेत. सारखं ठो..ठो..ठो... ! किती करायचं. गप्प सुरू होतं दुकान.. मंदीर, दर्गा, चर्च टाकलं की दुकान सुरू. कसलेच प्रश्न नाही. एक नारळ.. हार, कुंकू, तांदूळ, फुलाची चादर, ढीगभर मेणबत्त्या... याला प्रश्न विचारणाऱ्यांच्या मुर्तींची पूजा पण सुरू झालीय मस्त. 
दुकानात चलबिचल सुरू झाली की मध्ये मध्ये इतिहासाचं पानावर पण रेघोट्या मारता येतात. त्यांच्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर पुन्हा आपलं ठो..ठो..ठो...! 
बरं प्रश्न विचारणाऱे हातात पोस्टर घेऊन येतात आजकाल.. ओळखायला सोप्पं. यांच्यासारखे नाही, बालकवि बसायचं ठो ठो करायचं... आणि धूम.......!
प्रश्न विचारणाऱे सल्ला देतात. विचारांचा सामना विचारानेच वगैरे... म्हणून कधीमधी सामना.. कधीमधी सनातन प्रभात मधून सामना करायचा. पण हा मुकाबला कठीणच. विचाराचा समन्स विचारानेच.... पेपरमध्ये फोटो छापून अहिंसक मार्गाने फोटोवर फुल्ली मारायची. अहिंसा! 
मग प्रश्न विचारणारें चेकाळतात. पत्रक काढतात. मोर्चे काढतात. बोंबाबोंब करतात. आपण सहाच्या सहा लोड करायच्या... एकही प्रश्न न विचारतां सुरू करायचं ठो..ठो..ठो.....ठो....ठो...........! 
लगेच पळून जायचं. साला, यांचे प्रश्नच संपत नाहीत. कशाला पडतात यांना हे प्रश्न. मांडवली केली तर नाही चालणार का?  कुणी तरी पाद्री जादूच्या पाण्यानं रोग बरे करतो आणि जादूच्या पाण्याने धर्म ही बदलून टाकतो. धर्म बदलला की जगण्यासाठी राशनची व्यवस्था पण करतो. ज्याला जगण्यासाठी आरोग्य आणि राशन लागतं त्याच्या साठी धर्म महत्त्वाचा नसतो. एखादा पीर-हकीम ताईत बांधून रोग दूर करतो-वेड घालवतो.. एखादा मांत्रिक मंत्राने उपचार करतो. मुल-बाळ पैदा करून देतो. हे सगळे खरं म्हणजे तांत्रिक-मांत्रिक नसून अडाणी समाजाचे डॉक्टर आहेत. या समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा मागीतल्या तर कुणाचा धर्म बुडतो.  अडाणी लोकांची ही कहाणी..शिकलेल्या लोकांची थेरं तर विचारूच नका..केली केट उडवायच्या आधी बालाजीची पूजा, साडेसाती घालवण्यासाठी शनि ला तेल टाकलं तर यांचे काय जातं? पूल बांधायच्या आधी बोकड कापला तर यांचं काय नुकसान होतंय. गुप्तधनासाठी नरबळीचं शास्त्र ,आहे तर आहे ना आता....आयला खरंच... सोप्पं आहे ना सगळं.. घेणारा कुणीच प्रश्न विचारत नाही. कुणालाच प्रश्न पडत नाहीत. सगळं मस्त सुरू असतं. काही प्रॉब्लेम आला तर राजकारण्यांना मध्ये टाकून बोंब मारता येते धर्मबुडव्यांच्या विरोधात. अगदीच प्रॉब्लेम वाढला तर आहेच विज्ञानाने दिलेलं एक ठो..ठो चं यंत्र. दोन चार गोळ्या घातल्या की सगळं ओके.. प्रॉब्लेम इथेच झालाय. गोळ्यांनी ही माणसं मरतात पण यांचा विचार जिवंत राहतो. या विचाराचा किडा इतरांच्या मेंदूत पण वाढायला लागतो. या किड्याला मारणारी गोळी अजूनपर्यंत मिळाली नाहीय. ती मिळत नाही तो पर्यंत ठो..ठो..ठो गोळ्या चालवणाऱ्यांचा पराभवच होत राहणार. 
@ravindraAmbekar

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...

39 एके 39....39 दुणे...

मध्यंतरी नागपूर ला गेलो होतो हिंवाळी अधिवेशनाच्या कव्हरेज साठी.. अधिवेशनाचं रटाळ आणि एकसुरी कामकाज संपवल्यानंतर शनिवार - रविवार काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो.. खाणावळी शोधून तरी किती शोधणार.. नागपूरातले जवळपास सगळी हॉटेल्स आतापर्यंत जीभेखालून गेलीयत, त्यामुळे शनिवार - रविवार नागपूराच्या बाहेर जायचा प्लान करत होतो.. मंत्री नितिन राऊतांशी बोलताना समजलं की वाशिम मध्ये काही युवकांनी एक चांगला प्रोजेक्ट केलाय, पाहण्यासारखा आहे. पूर्णत: कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेलं पण आता पंतप्रधानांचं पॅकेजच काय पण कुठलीही सरकारी कर्ज घेणार नाहीत म्हणणारं विदर्भातलं पहिलं गाव माझ्या निदर्शनास आलं.. इंटरेस्टींग वाटलं, म्हटलं जाऊन येऊयात, पण आता अशी पॉझीटीव्ह स्टोरी लागेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी दिल्ली शी बोललो.. एरव्ही मला आतापर्यंत मला नोकरी देणाऱ्या कुठल्याही चॅनेलने फिरू नको असं कधीच सांगीतलं नाही, आताही तसाच अनुभव आला... दिल्ली हून ओके मिळाल्यानंतर शनिवारी जायचं ठरलं. नकाशा किंवा जीपीएस च्या माध्यमातून रस्ते शोधत जाण्याचा माझा जुनाच छंद आहे. रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना थांबवून प...