Skip to main content

देवगिरी ते दादागिरी

दादांच्या राजीनाम्या नंतर त्याच्या कारणांविषयी बरीच चर्चा झाली. दीदींनंतर दादांनी मागचा आठवडा गाजवला. दीदींच्या पाठोपाठ दादांचं बंड किंवा राजीनामा म्हणजे युपीए ला झटका औहे अशी चर्चा सुरू होण्याआधीच मोठ्या पवारांनी चर्चा संपवून टाकली. तरी सुद्दा पवारांच्या लेखी संपलेला हा विषय इथे संपला नाही तर इथून सुरू झाला असं सारखं सारखं वाटत होतं. दादांनी २५ ला राजीनामा दिला आणि २६ ला प्रफुल्ल पटेलांनीी सांगीतलं की ंआता यापुढे सरकार मध्ये कुणीही उपमुख्यमंत्री असणार नाही. पादुका सिंहासनावर ठेऊन राज्य करेल असा भरत सापडला नाही म्हणून की काय किंवा आता रामालाच पादुका देण्याची इच्छा उरलेली नाही म्हणूनही असेल कदाचीत पण उपमुख्यमंत्री पद दादांसाठीच राखीव ठेवल्याचं स्पष्ट करून एनसीपी ने जवळपास जाहीर केलं की त्यांना पक्षात काही पंगा घडवून आणायचा नाहीए, टार्गेट काही औरच आहे.

दादांच्या राजीनाम्यामागचं खरं राजकारण अजूनही बाहेर आलं नाही. हळूहळू ते बाहेर येइलच याची काही ग्यारंटी नाही. एरवी मीडीया मध्ये दादा आणि ताईच्या मध्ये "x" अशी फुल्ली मारून बातम्या चालवण्याची पद्धत रूढ झाली होती, अशा फुल्लीच्या खेळातील दादा-ताई एकदम हातात हात घालून बागडू लागलेयत. दादांनी ताईंची तर ताईंनी दादांची तारिफ करण्याची स्पर्धाच लावलीय, 

कनफ्यूजन चा कहर म्हणजे मोठे पवार एकाच वेळी दोघांचीही तारिफ करतायत. अशा अनन्यासाधारण परिस्थितीत एनसीपीतील कंपूग्रस्त कार्यकर्त्यांना काका-दादा-ताई यांच्या पैकी कुणाला कौल लावावा अस प्रश्न पडलाय. प्रत्येक देवाचं पत्थ्य वेगवेगळं असल्यानं कधी शेतकरी मोळावा तर कधी युवती मेळाव्याच्या निमित्ताने खर्च वाढा़यला लागलीय, दुसरीकडे आपण आता सत्तेत नाही त्यामुळे काटकसरीने वागा, सारख्या गाड्या काढून शहराकडे येऊ नका असा सल्ला दादांनी दिल्यामुळे अनेकांच्या अंगावरली सत्तेची सूज आता ठणकायला लागलीय. दादा एकटेच बाहेर गेलेयत, सत्ता अजून आहे की! पण दादा बोलतायत म्हणजे काहीतरी खरं असणार असा विश्वास ही कार्यकर्त्यांना आहे, म्हणूनच सातऱ्याच्या युवती मेळाव्याला सत्तेत असलेले आणि नसलेले कार्यकर्ते - नेते काटकसरीचा उपाय म्हणून आॅडी-बीएमडब्ल्यू अशा गरीबा घरच्या गाड्यांचा वडापासारखा वापर करत पोहोचले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच चिंता - सातवा की नववा सिलिंडर मिळणार नाही याची नाही हो-गर्दी गोळा तर केलीय पण जास्त केलीय म्हणून दादांना वाईट वाटेल की अजून का नाही आणली नाही म्हणून ताईंना वाईट वाटेल. त्यापेक्षा मोठ्या साहेबांना काय वाटेल? 

दादांनी मग प्रेस काॅन्फरन्स घेऊन प्रश्नांना उत्तरं देण्यााच..... साॅरी उत्तरांतून नवे प्रश्न निर्माण करण्याचा पर्यत्न सुरू केला. दादांनी सांगीतलं की हा पवार विरुद्ध पवार असा लढा नाही, त्यांनी राजीनामा फेकलेला नाहीय तर दुधखुळ्यासारखं न वागता त्यांनी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, आणि वडिलधाऱ्यांचा सम्मान करत त्यांनी मोठ्या पवारांना कळवलंं.
पुन्हा सर्व सोप्पं वाटायला लागलं ना... पण हे जरा काॅम्प्लीकेटेडच ंआहे. 
एवढं काॅम्प्लीकेटेड की राजीनाम्यानंतर लगेंच तिसऱ्या दिवशी अजीत पवार एकदम मुख्यमंत्र्यावर हल्ला चढवतात. आत्तासं साफ व्हायला लागतं की यांचं टार्गेट कांग्रेस आहे. दिल्लीत आपलं स्थान बळकट करण्यासाठी मोठ्या साहेबांनी कलेली ही खेळी तर नाही ना, पुन्हा सोप्पं वाटायला लागलं आणि साताऱ्यात प्रेस काॅन्फरन्स मध्ये अजीत दादा त्यांच्या अजेंड्यावर विरोधी पक्ष असल्याचं घोषीत करतात. कोळसा घोटाळ्यात विरोधी पक्ष असल्याच्या बातम्या येत असल्याने विरोधी पक्षांनी त्यांच्यावरचे आरोप टाळण्यासाठी आपल्यामागे घोटाळ्यांचे आरोप लावले होते की काय अशी शंका आपण उपस्थित केली होती असा खुलासा केला अजीत दादांच्या या खुलाश्यानंतर पुण्यात झळकलेल्या बोले तैसा चाले अशा आशयाच्या पोस्टर्सना अधिकच झळाळी आली.
देवगिरी हून बाहेर पडल्यानंतर आता दादांना तशी कुणाचीच भीती वाटत नाहीए. ते कुणाच्या बा ला घाबरत नाहीत, अध्ये - मध्ये काकांना घाबरतात एवढंच, मध्ये-मध्ये ते त्यांनाही घाबरत नाहीत म्हणतात. दादांनी सत्तेत असताना केली नव्हती तेवढी दादागिरीची तयारी सुरू केलीय. सत्तेत नसल्यानं कुणी घाबरायचं सोडू नये म्हणून ते आधी एनसीपीच्या मंत्र्यांनाच घाबरवतायत. दादांच्या जाण्यानं खूष असलेले मंत्री घाबरण्याचं नाटक करतायत, तर बाकीच्यांना ही केविलवाणी धडपड पाटतेय. मोठे पवार मात्र ंअजीत दादांच्या नैतिकतेवर खुष असल्याने सर्व मंत्र्यांना नैतिकतेचा नवा धडा शिकवण्यात गुंग आहेत. श्वेतपत्रिकेत काय काय असायला हवं याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा ही पूर्ण झालीय त्यांची. काॅंग्रेसमध्ये सोनियांच्या निमित्ताने एक त्यागमूर्ती आहे, एनसीपीमध्ये पण अशीच एक मूर्ती असायला पाहीजे अशी साहेबांची इच्छा होती, ती वेळीच पूर्ण झाली. आता सर्व काही चांगलं होईल असं ग्यारंटी कार्ड लालबहादूर शास्त्रींनी जितेंद्र आव्हाडांच्या घरी पाठवलंय, ते ग्यारंटी कार्ड चुकून हाती पडल्यानं छोट्या साहेबांना ही धीर आलाय. आता सर्वच चांगलं होणार आहे मग माघार कशाला घ््यायची या विचाराने भारावलेल्या छोट्या साहेबांनी फटाक्यांची माळ लावायला सुरूवात केलीय. एक दोन फटाके इकडे तिकडे वाजले तर घाबरून जाउ नका, हा त्यांचा पहिलाच राजीनामा असल्याने थोडा अंदाज चुकणारच, त्यातही मध्येच वाजणारे सुतळी बाँब आपण पेरलेलेच नाहीत असं ही ते कुजबुजत होते पण फटाक्यांच्या आवाजात काहीच ऐकू आले नाही. 
काही जण आतला आवाज ऐकण्यात बिझी होतो म्हणून बहाणा देऊन पळाल्याच्या ही बातम्या आहेत. 
पुन्हा राष्ट्रवादी म्हणजे सरदारांची पार्टी असल्याने सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका का बजावायची असं काहींचा आतला आवाज सांगत असल्याचं बाहेर ऐकू येत होतं. सरकारमध्ये राहून टगेगिरी ठीक आहे पण बाहेर राहून रिमोट कंट्रोलची दादागिरी महाराष्ट्राने या आधीही पाहीलीय. सतत मागे कोणी आहे की नाही याचं बटन चाचपण्यातच जास्त वेळ जातो असा काकांच्या मित्रांचा अनुभव आहे. 
सत्तेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दादा वाचाळवीराच्या भूमिकेत शिरले, ह्याच स्ट्रॅटेजीने ते पुढे जात राहीले तर त्यांचा अभिमन्यू झाल्याशिवाय राहणार नाही. 

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...

मराठ्यांचा अणुबाँब

मराठ्यांचा अणुबाँब लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरतोय. या समाजात प्रचंड ताकद आहे. कधी लढवय्या, सधन-निर्धन शेतकरी असलेला हा समाज कालांतराने शासक आणि 'व्यवस्था' बनला. भिडायची सवय, टोकाची अस्मिता, जय शिवाजी म्हटलं की सळसळणारं रक्त, जातीचा प्रचंड अभिमान असा हा मराठा अर्थ-सत्ता आणि समाजकारणातील महत्वाचा घटक बनला. जागतिक अर्थव्यवस्था बदलत असताना काही लोकांनी कालानुरूप बदल केले, काहींना यागोष्टींची हवा लागली नाही. ज्यांना हवा लागली नाही ते आज रस्त्यावर आहेत. शेतजमीनीचे तुकडे पडले, बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती बेभरवश्याची झाली. त्यामुळे शेती किंवा शेतीवर मजूरी करूनही चांगले पैसे मिळवणारा समाज हळूहळू गरीब होत गेला. मिश्यांचा पिळ कायम राहावा म्हणून कर्जबाजारी होत गेला. 'अख्खा गाव मामाचा, पण कोण नाही कुणाचा!' अशी स्थिती आज मराठा समाजाची झाली आहे. मराठा समाजाच्या गरिबीचं खोलात जाऊन असं बरंचंस विश्लेषण करता येऊ शकेल. कोपर्डीच्या निमित्ताने राग व्यक्त करण्यासाठी हा अस्वस्थ समाज बाहेर पडला आणि हळूहळू तुंबलेली सगळी अस्वस्थता बाहेर यायला लागली. मराठा अशी 'जात' च...