Skip to main content

पत्रकारितेची चिंता...

पत्रकारितेची चिंता...


Ravindra Ambekar at tea stall
पत्रकारितेचं काय होणार याची सर्वांना चिंता लागली आहे, मला ही अंशी चिंता वारंवार सतावते. सरकार दमन करते म्हणून पत्रकारिता धोक्यात आहे असं म्हणणं मला धाडसाचं वाटतं. खर तर पत्रकारिता पत्रकारांमुळे सुद्धा धोक्यात आहे.

गेल्या काही वर्षांपासून मी नवोदीत तसंच वरिष्ठ पत्रकारांच्या नोकरीसाठी मुलाखती घेत आलोय. ओळख आहे म्हणून नोकरी मिळेलच अशा अपेक्षेने अनेक जण मुलाखत द्यायला येतात. मुलाखतींदरम्यान जे अनेक विषय माझ्या लक्षात आले ते थोडं संगतवार मांडण्याचा प्रयत्न करतो, मग पुढचा विषय मांडतो. मी सुद्धा नोकरीसाठी मुलाखती दिल्यायत. तो नर्वसनेस मी सुद्धा अनुभवलाय. काही ठिकाणी तर मला माझं प्रेझेंटेशनच करता आलं नाही. मी काय करू शकतो हे सांगता आलं नाही, आणि मी नोकरी मिळवण्यात फेल झालो. माझं म्हणणं असायचं की मला संधी द्या, आणि मी काय करू शकतो ते एकदा बघा, पण केवळ इतक्या भांडवलावर नोकरी मिळू शकत नाही हे मला टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसल्यानंतर समजायला लागलं.
कॉन्फीडन्स हा भाग वगळला तरी काही बेसिक गोष्टी असतात ज्यावर पत्रकारांनी लक्ष दिल पाहिजे. काम करता करता कॉन्फिडन्स येऊ शकतो म्हणून मी कॉन्फिडन्स ला नेहमीच कमी मार्क ठेवायचो.

१) स्क्रीप्ट - आपल्याला चांगलं लिहिता यायला पाहिजे. मध्ये गॅप झाला म्हणून लिहायचं विसरलो-विसरले असं सांगणाऱ्यांनी पत्रकारितेत येऊ नये. अशा लोकांना पत्रकारिता प्रशिक्षण केंद्रांनी केवळ पैसे मिळतात म्हणून पास ही करू नये. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्राचा पायाच चांगलं शैलीपूर्ण लिहिण्याचा आहे.
२) मांडणी आणि कल्पकता - आपल्याला जे मांडायचं आहे ते किमान आपल्याला समजेल असं लिहिलं पाहिजे. ते जर समजलं असेल तर कल्पकतेने मांडता यायला पाहिजे.
३) शोधक वृत्ती - बातमी कशी शोधायची, त्यासाठी सोर्सेस कसे मिळवायचे, एखादी बातमी कन्फर्म करून कशी घ्यायची याची हौस अंगभूत असणे गरजेचे आहे. जर जे दिसतंय ते सत्य मानून चाललं तर मग पत्रकारांची गरजच काय.
४) अभ्यास करण्याची वृत्ती - आपल्याला जितकं सांगितलंय तितकंच काम करायचं, किंवा जितका पगार तितकं काम अशी वृत्ती बाळगून पत्रकारितेत येऊ नका. जो विषय मांडायचा आहे त्या विषयाचा किमान अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास करण्याची इच्छा असली पाहिजे. किती अभ्यास करायचा याचं गणित पगारावर अवलंबून असता कामा नये.
५) तंत्रज्ञानाची माहिती - अनेक लोकांना साध टायपिंगही करता येत नाही. सवयीने टायपिंग शिकता येऊ शकेल,पण हा शिकण्याचा भार जो नोकरी देणार आहे त्यावर न टाकता आपापल्या शैक्षणिक संस्थांवर टाकायला हवा. विद्यार्थी जीवनातच टायपिंग शिकून बाहेर पडायला हवं. पत्रकारितेतही आता नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अल्गोरिदम, ॲनॅलिटीक्स येत आहे. बातम्या लिहिताना आता याचा वापर केला जातो. चांगलं कंटेट असेल तर ते सर्व अल्गोरिदम आणि ॲनॅलिटिक्स मागे टाकतं, पण कंटेट जर सुमार असेल तर तुम्हाला असे टूल्स वापरावे लागतात. आपण ज्या क्षेत्रात जाणार आहोत त्या क्षेत्रात उद्या तंत्रज्ञानाने आपली नोकरी गटकावू नये असं वाटत असेल तर भविष्यातील सर्व येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे, ते हाताळण्याची तयारी असली पाहिजे, खळखळ असता कामा नये.
६) गैरसमज - कॅमेरासमोर बोलता येतं म्हणजे पत्रकार असा समज सध्या पसरलाय. चांगली बातमी शोधता यायला पाहिजे, कॅमेरासमोर ती मांडता यायला पाहिजे. विश्लेषण बातमीवर होऊ शकतं, विश्लेषणासाठी चांगली इन-डेप्थ बातमी आवश्यक असते. रिपोर्टरच अर्धवट बातम्या देत असतील तर विश्लेषण ही अर्धवटच होईल. अनेक रिपोर्टर तर फिल्डवर बातमीदारी कमी आणि विश्लेषण जास्त करतात, कारण त्यांच्याकडे बातमीच नसते.
७) हे माझं काम नाही - हे माझं काम नाही या भावनेतून बाहेर पडलं पाहिजे. कॅमेरामन ला बातमी लिहिता यायला पाहिजे, कॅमेरासमोर बोलता यायला पाहिजे. रिपोर्टर ला कॅमेरा वापरता यायला पाहिजे, एडीटींग करता यायला पाहिजे. संपूर्ण पॅकेजिंग करता यायला पाहिजे.


८) रिटायर्डमेंट ची भावना - अनेक वरिष्ठ पत्रकार नोकरी गेली म्हणून तक्रार करतात. जास्त पगार असणाऱ्याची जबाबदारी ही जास्त असते. पण अनेकदा सिनिअर झालो म्हणजे काम कमी केलं पाहिजे अशा भावनेत काही पत्रकार जातात. ते फिल्डवर जायचं टाळतात. मध्यंतरी एका वरिष्ठ पत्रकाराला मी कॅबिनेट मिटींग कव्हर करायला सांगितलं तर त्यांनी मला एखाद्या ज्युनिअर माणसाला पाठवा असा सल्ला दिला. म्हणजे ज्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ उपस्थित असतं. जिथे राज्याच्या कल्याणाचे किंवा काही लोकांना फायदा पोहोचण्याचे निर्णय घेतले जातात, ज्या बैठकीत बसण्यासाठी विरोधी पक्षातील नेतेहयात घालवतात त्या बातमीला पत्रकार किरकोळ मानायला लागतात तेव्हा त्यांच्या गच्छंतीची तयारी ते स्वतःच करत असतात. जास्त पगार म्हणजे कमी काम असा अर्थ नाही तर तुमची जबाबदारी वाढलेली आहे, संस्थेच्या वाढीतलं तुमचं योगदान ही वाढलेलं आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा बातमीला, राज्याला व्हायला पाहिजे ही भावना विसरून चालणार नाही. असे लोक सतत नवीन लोकांच्या नाविन्यपूर्ण विचारांना-उपक्रमांना खोडा ही घालत असतात.
९) जो जे सांगेल ते सत्य - अनेक पत्रकार फक्त बाइट बेस्ड जर्नालिजम करतात. एखाद्याने बाइट दिला की हंगामा करतात की माझ्याकडेच एक्स्लुसिव आहें, तरी कंपनी बाइट चालवत नाही. खरं तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्या बातमीत काही इम्पॅक्ट नाही ती बातमीच नाही अशा एका थिअरीवर तुमची स्टोरी खरी उतरते का.. आपल्या बातम्यांना हा निकष लावून बघा. अनेकदा अशा बाइटना ब्रेकींग स्टोरी समजण्याची गल्लत पण केली जाते.
१०) आपल्याला करायचं काय आहे हे शेवटपर्यंत न समजणे - मी पत्रकारितेत का आलोय किंवा आर्य हेच अनेकांना माहित नसतं. बॉस सांगेल ती बातमी करणे हाच अनेकांच्या नोकरीचा निकष आहे. तुमचं प्राविण्य कशात आहे हे शोधता आलं पाहिजे. स्वतःहून बातम्या शोधता आल्या पाहिजेत. त्या वर इम्पॅक्ट घेता यायला पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत.

अजूनही बरंच काही आहे. पण मिशन नसलेल्या पत्रकार, माध्यमं आणि मालकांमुळे खर तर पत्रकारिता धोक्यात आहे, सरकार आणि राज्यकर्त्यांचा नंबर फ़ार नंतर लागतो असं माझं प्रामाणिक मत आहे.

- रवींद्र आंबेकर


















 

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...

39 एके 39....39 दुणे...

मध्यंतरी नागपूर ला गेलो होतो हिंवाळी अधिवेशनाच्या कव्हरेज साठी.. अधिवेशनाचं रटाळ आणि एकसुरी कामकाज संपवल्यानंतर शनिवार - रविवार काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो.. खाणावळी शोधून तरी किती शोधणार.. नागपूरातले जवळपास सगळी हॉटेल्स आतापर्यंत जीभेखालून गेलीयत, त्यामुळे शनिवार - रविवार नागपूराच्या बाहेर जायचा प्लान करत होतो.. मंत्री नितिन राऊतांशी बोलताना समजलं की वाशिम मध्ये काही युवकांनी एक चांगला प्रोजेक्ट केलाय, पाहण्यासारखा आहे. पूर्णत: कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेलं पण आता पंतप्रधानांचं पॅकेजच काय पण कुठलीही सरकारी कर्ज घेणार नाहीत म्हणणारं विदर्भातलं पहिलं गाव माझ्या निदर्शनास आलं.. इंटरेस्टींग वाटलं, म्हटलं जाऊन येऊयात, पण आता अशी पॉझीटीव्ह स्टोरी लागेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी दिल्ली शी बोललो.. एरव्ही मला आतापर्यंत मला नोकरी देणाऱ्या कुठल्याही चॅनेलने फिरू नको असं कधीच सांगीतलं नाही, आताही तसाच अनुभव आला... दिल्ली हून ओके मिळाल्यानंतर शनिवारी जायचं ठरलं. नकाशा किंवा जीपीएस च्या माध्यमातून रस्ते शोधत जाण्याचा माझा जुनाच छंद आहे. रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना थांबवून प...